07/07/2024
चि. प्रसाद,
माझ्या लिखाणाच्या गडबडीत वाचायच्या पुस्तकांची मोठी थप्पी साठलीय.
काल मी तुमची 'बगळा' हाती घेतली आणि आज पूर्ण केली.
अफलातून!
प्रथम सॅल्यूट तुमच्या शब्दकळेला! उदगीरची प्रादेशिक बोली, अडनेड्या वयातल्या मुलग्यांची बोली, जाती-व्यवसायांची बोली आणि त्यात रूपरंग बदलून मिसळलेले इंग्रजी यांतून तुम्ही जे एक अनुभवविश्व उभे केलेत ते केवळ अपूर्व आहे.
म्हटले तर, कथानकाचा जीव इवलासा आहे. पण ते आकाराला येतांनाचा प्रत्येक घटक तुम्ही असा रचला आहात की तो अपरिहार्यच ठरतो.
मित्रांची जिगर दोस्ती चितारतांना वेगवेगळ्या जाती-वर्गातील घरांचे, मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांबद्दल पाहिलेली स्वप्नांचे कोलाजही त्यात उमटतात.
शाळेतला गीतेचा अध्याय, शिक्षकांना करावी लागणारी कामे, चिंतूला दिलेली नाकाने फळा पुसायची शिक्षा यांतून तुम्ही सहजच शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करता.
चिंतूची गोष्ट वेगवेगळ्या निवेदकांकडून सांगून तुम्ही चिंतू, त्याचे कुटुंब, शाळेचे जग, गाव, पारध्यांचे जग हे सगळेच कवेत तर घेताच आणि या सगळ्याचे एक कॅलिडोस्कोपिक चित्र उभे करता.
चिंतू स्वतः, स्वतःविषयी कमीच बोलतो पण तो त्याच्या कृतीमधून कळत जातो अन भारीच गोड वाटतो.
त्याची आई मीरा, बहीण पिंकी, मोठी आई, गोविंद काका, वडील हे कुटुंब प्रातिनिधिकही आहेच. अपवाद चिंतूचा.
चिंतूच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि चिंतूने ज्याचा बॉल हारपलाय तो संतोष यांचे वागणे कादंबरीला एका वेगळ्याच ऊंचीवर नेते. कदाचित ते लेखकाचे wishful thinking असेल. तेही कथानकात यावेच, असे मला व्यक्तिशः वाटते.
अजूनही खूप लिहिता येईल. पण थांबते.
६/७/२४
तुमची दुसरीही दोन पुस्तके पाठोपाठ वाचली.
उदगिरी बोलीतल्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्यां'चा गुच्छ... त्याला तुम्ही कादंबरी म्हटलंय. रूढ अर्थाने जिला कादंबरी म्हटले जाते तिचे रूप-बंध सैल करत तुम्ही खरंतर नवा आकृतिबंध घडवला आहात, असे मला वाटते. यात कुणी एकच व्यक्ती केंद्रस्थानी नाही, तिच्या भोवती आकाराला आलेले एक कथानक नाही अन म्हणून कथानकाचा एक असा उत्कर्षबिंदू नाही.
प्रत्येक बारकुली ष्टोरी हा पाण्याचा एक टपोरा थेंब आहे आणि तो आपल्या भोवतालचे चिमूटभर आकाश अन अवकाश असे काही प्रतिबिंबित करतो की... ते दृकमय असतेच, शिवाय त्यातून कथनकाराच्या जाणिवा-संवेदना देखील उमटतात.
सरोजा, हेमा आत्या, आई, मोठ्याई यांच्या व्यक्तिगत व्यथा-वेदना जशा त्यातून उमटतात तशा 'लक्ष्म्या' मधून घरंदाज कुटुंबातील स्त्रीजीवनाचा एक कप्पा हळूच किलकिला होतो.
कोळेकर बाईंच्या निलेशच्या निमित्ताने गावातल्या तरूणांसमोर आदर्श उभे करता करता तरूणांची स्वप्ने कशी कोमेजत जातात.... हे आणि अनेक दबलेले आवाज तुमच्या कथनातून ऐकू येतात.
गावातल्या चालीरीती, कुटुंबातील मानसिकता, वेगाने बदलत चाललेले ग्राम जीवन व त्याचे व्यक्तिजीवनावर व व्यक्तिमनावर उमटणारे ओरखडे यांचे प्रगल्भ भान कथनकाराकडे असल्याची साक्ष तुमच्या लेखनातून मिळते.
ललित लेखन ही भाषिक संरचना आहे, भाषा हे साहित्य कलेचे माध्यम आहे, शब्दांच्या चपखल योजनेतू अर्थाला कसे प्रवाहित करता येते ते तर तुम्हाला चांगलेच उमगले आहे.
'अतीत कोण? मीच' मधून 'मी' चा शोध तुम्ही तत्त्वज्ञान, समाज, व्यक्ती, घटना, साहित्य , कला, अशा किती किती अंगांनी घेतलाय!
तुमचा व्यासंग, जिज्ञासा, माहिती -ज्ञान मिळवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा तुम्ही करत असलेला वापर याचा प्रत्यय तुमच्या वैचारिक लेखनातून येतो. बालसाहित्यावरील लेख मला विशेष आवडला. करोनाकाळाचे नजिकचे अनुभव साक्षीभावाने न्याहाळलेत तुम्ही!
आता 'इत्तर' च्या प्रतीक्षेत!
खूप शुभेच्छा!
प्रतिभा कणेकर
https://www.facebook.com/100000426015403/posts/8135378666486253/