20/02/2026
🔸दुर्मिळ पुस्तके उपलब्ध!!
१)प्रियजन- गिरिजा ओक: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- व्यक्तिदर्शन, व्यक्तिचित्रे, व्यक्तिदर्शन, साहित्यविषयक, आठवणी, किस्से )
( 'ही सर्व व्यक्तिमत्वं सत् च्या विचारानं भारलेली आहेत. हाती घेतलेलं काम निष्ठेनं करणारी आहेत. आजच्या भ्रष्टाचारी जगात, पैशामागे पिसाटासारखे धावणारे लोक आपण पाहातो. पैसा हाच परमेश्वर मानणाऱ्या अशा मंडळींना कसलाच विधिनिषेध नसतो. अशावेळी तरुण पिढीपुढं काही जीवनमूल्यं ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजते. कृतीतून, उक्तीतून आणि लेखणीच्या माध्यमातून हे शक्य आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य यांची मी स्वतःही पुरस्कर्ती आहे. तरीदेखील आपल्या आचार-विचारांमागे विवेकाची एक शहाणी चौकट असायला हवी यावर माझी श्रद्धा आहे. म्हणूनच ज्या ज्या मार्गानं काही चांगलं रुजवता येईल ते रुजवण्याची माझी धडपड असते. जीवननिष्ठा जपणाऱ्या गिरिजा कीर यांच्या या पुस्तकातून त्यांच्या वरील उद्गारांचं प्रत्यंतर वाचकांना येईल'. )
०००
२)गुलमोहराची पाने -माधव गडकरी (दुर्मिळ पुस्तक, प्रकार -लेखसंग्रह, साहित्य,कला, समाजदर्शन राजकारण)
ऐक्य' या साताऱ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राचा ७६ वा वाढदिवस दि. १९ जानेवारी १९९९ रोजी साजरा झाला. त्यानंतर अल्पावधितच 'गुलमोहराची पाने' हा माझा लेखसंग्रह प्रसिद्ध होत आहे, याचा मला आनंद वाटतो.
फेब्रुवारी १९९७ मध्ये 'चौफेर' हे सदर लिहिणे मी बंद केले. आमच्याकडे लिहा, अशी मागणी मुंबई शहराबाहेरच्या वृत्तपत्रांची अधिक होती. त्यात 'ऐक्य' चे श्री. पळणिटकर बंधू हे प्रमुख होते. श्री. शरद पळणिटकर घरीच आले. आणि त्यांनी ‘रोज लिहा' असा मंत्र दिला. रविवार सोडून रोज लिहावयाचे तसे अवघड होते. कारण माझे इतर लेखन चालूच असते. दि. ११ ऑक्टोबर १९९७ या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मी लेखन सुरू केले. आणि ते आजतागायत अखंड चालू आहे. 'चौफेर'चाच हा नवा आविष्कार आहे. विषय आणि भाषा यात थोडा फरक केला आहे.
जिल्हापत्रे वाढली पाहिजेत ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका. कारण मीही अगदी सुरूवातीस एका जिल्हापत्राचाच संपादक होतो. मुंबईची वृत्तपत्रे चाळली जातात आणि जिल्हापत्रे वाचली जातात. मुंबईच्या वृत्तपत्राशी तोडीस तोड 'ऐक्य' दैनिकाचे आज स्वरूप झाले आहे. त्यामुळे तेथे लिहिताना आनंद वाटतो.
'गुलमोहरा' चे झाड हे माझ्या आयुष्यात मित्रासारखे वावरले. त्याच्या साथीनेच सर्व लेखन झाले. गुलमोहराचे निरीक्षण करीत बसावे आणि दुसऱ्या दिवशी वसंताचे आगमन होताच त्या पानांची फुले झालेली दिसावीत असे अनेकदा घडले. ती स्मृती कायम राहावी म्हणून सदराला तसे नाव दिले.
त्या पानांवरच लिहिलेले हे लेख. शब्दांची फुले व्हावीत या अपेक्षेने लिहिलेली. मग विषय अनंत. साहित्य, कला, शिक्षण, समाजदर्शन, आणि रोज ढवळून निघणारे राजकारण. त्यावरील ही टीका टिपणी. विचारांना चालना देणारी !
माधव गडकरी...
३)आठवण- गंगाधर गाडगीळ: ( आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- नवकथा संग्रह )
( गंगाधर गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला.
एखाद्या अनुभवाला, भाववृत्तीला अनेक अंगं असतात. आणि ती एकमेकांहून भिन्नच नव्हते, तर कित्येकदा परस्परविरुद्धही असू शकतात; या गोष्टींचे भान राखून विविध अंगांनी घेतलेला अनुभवाचा वेध गाडगीळांच्या कथेत आढळतो. असं बाह्यांगी दर्शन हे या कथेचं एक वेगळेपण ठरते, याचा प्रत्यय या संग्रहातील कथांमधून येतो.
या संग्रहात एकूण ८ कथा समाविष्ट आहेत. )
०००
४)काळोख- संजय सोनवणी: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- कादंबरी )
( मानवी जीवनाचा प्रवाह हाच मुळी व्यामिश्र - गुंतागुंतीचा, यश अपयशाच्या भोवऱ्यांचा; पण त्यातूनही मनुष्य तगतो ते त्याच्या परिस्थितीवर मात करण्याच्या चिवट जाणिवेनेच !
'काळोख' ही केवळ एका परिवाराची कथा नाही तर...
समाजाच्या एका विशिष्ट कालखंडातील प्रवाहांची आणि त्यांचा मानवी जीवनावर पडणाऱ्या प्रभावाची मनोवैज्ञानिक गाथा आहे.
कल्पना, विद्याधर, सुधाकर, जया, बाबा आई व इतर अन्य पात्रे, या सामाजिक प्रवाहांची अपरिहार्य शिकार होतात.
पण त्यातूनही मनाला भिडते ती त्यांची परिस्थितीवर परंपरांवर मात करण्याची विलक्षण जिद्द!
त्या दृष्टीने ही कादंबरी लक्षणीय आहे ! )
०००
५)झोका ( संपादित कथासंग्रह): ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- विविध लेखक/ लेखिकेंचे कथा एकत्रित असलेले संपादन, कथासंग्रह, स्त्री मासिकातून निवडलेल्या उत्कृष्ट कथांचा संग्रह)
( कथा या वाङ्मयप्रकाराबद्दलचं प्रेम जितकं सनातन आहे, तितकंच नियतकालिकांशी, त्यातही मासिकांशी असणारं त्यांचं नातं सनातन आहे. 'स्त्री' मासिकात सुरुवातीला, जवळजवळ पंचेचाळीस सालापर्यंत दर अंकात सहा ते आठ इतक्या कथा आलेल्या आहेत. काळाच्या ओघात या संख्येचा संकोच झाला असला तरी दर्जाशी तडजोड सहसा झालेली नाही त्यातही दिवाळी अंक, विशेषांक उत्तम कथांची आवर्जून दखल घेत असतात त्यांची झलक दाखविण्यासाठी ठराविक कालखंडात 'स्त्री' मध्ये प्रसिद्ध झालेल्या निवडक कथांचे संग्रह प्रसिद्ध करावेत असे आम्ही योजिले आहे. प्रस्तुतचा संग्रह हा त्या उपक्रमातला पहिला भाग कालखंड १९७० ते १९७५ एवढ्या दीर्घ काळातल्या दीडदोनशे कथांमधून दहापंधरा कथा निवडताना एखादाच ठाशीव निकष लावणे कठीण पडते. एकीकडे त्या त्या काळातली त्या कथेची लोकप्रियता, त्या त्या लेखकाच्या इतर लेखनामध्ये तिचे असणारे स्थान, तिचा सांस्कृतिक सामाजिक संदर्भ लक्षात घ्यावा लागतो तर दुसरीकडे संग्रहातले विषयांचे वैविध्य, वाचकांचे रुचिवैचित्य यांचेही भान ठेवावे लागते. या सर्वच बाबतींत शक्य तितकी समतोल व प्रातिनिधिक दृष्टी ठेवून या संग्रहातील कथांची निवड केलेली आहे. प्रसिद्धीच्या कालक्रमानुसारच त्यांचा संग्रहातला क्रमही ठेवण्यात आलेला आहे. दरम्यानच्या काळात कथा या वाङ्मयप्रकारात खूपच बदल झाले. स्त्री जीवनाचा तोंडवळा बदलला, समस्यांचे संदर्भ बदलले. पण झोका जितका उंच जाईल तितकी मागच्याची ओढ व पुढच्याचे कुतूहल वाढायचेच वाचकांनाही असाच अनुभव आल्यास आम्हांला आनंद वाटेल. )
०००
६)अवकाश- जी. के. ऐनापुरे: (दुर्मीळ आवृत्ती (प्रथमावृत्ती,प्रकार-कादंबरी )
( जी. के. ऐनापुरे यांची ही पहिलीच कादंबरी.
०
स्वतःच्या आयुष्यातला संपूर्ण भूतकाळ मागे टाकून नव्याने आपल्या जगण्याच्या अवकाशात तपशील भरणाऱ्या आणि तरीही या अवकाशातल्या कारपणाची जाणीव जगणाऱ्या स्थलांतरित चंदरची ही कहाणी.
मी कोण आहे ? याचं अगदी प्राथमिक उत्तर 'मी माणूस आहे' असं देता येतं आणि 'माणूस असणं' याचा अर्थ जगण्याच्या प्राथमिक गरजांसाठी 'झगडणं' आलंच! चंदर असा झगडत झगडत, धडपडत धडपडत स्वतःच्या भौतिक जगण्याला अत्यंत प्रामाणिकपणानं प्रस्थापित करीत चाललाय आणि जगता जगताच अस्तित्वाचे नवनवीन अर्थही त्याला कळू लागलेत. सर्वांत असूनही एकाकी असणं, भोवतालच्या कोलाहलात स्वतःचा आतला आवाज शांतपणे ऐकत राहणे, ही त्याची वृत्तीवैशिष्ट्ये.
चंदर साईनबोर्ड पेंटींग्ज करणारा एक तरुण. कलावंताची दृष्टी असलेला आणि कारागिरीचा व्यवसाय करणारा. निर्मितीचा व्यवहार आणि व्यवहारातील निर्मिती यांचा ताळमेळ आणि त्यापायी होणारी घालमेल.... समजणे उमजणे, कळणे न कळणे, मिळणे न मिळणे यातल्या अनेक, आडवाटेवरच्या येरझाऱ्या ! शेवटी आपले असणे म्हणजे काय ? आणि नसणे म्हणजे तरी काय ?.... एक मोठा चक्रव्यूह ! आत घुसता येईल. पण बाहेर कसं पडायचं ?....
आजचे एक तरुण आणि समर्थ समकालीन कथाकार जी. के. ऐनापुरे यांची प्रकाशित होणारी 'अवकाश' ही पहिली कादंबरी. एका निश्चित अशा अर्धनागर, अर्धग्रामीण परिसरातल्या सर्वांगानं बदलत्या वास्तवाचा समंजस वेध घेत घेत आस्तित्वाच्या मुलभूत प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य दाखवणारी ही कादंबरी. एका उपेक्षित विषयामुळे तर नाविन्यपूर्ण आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तिचे आशयद्रव्य मोलाचे आहे.
- अविनाश सप्रे )
०००
७)सकाळचे ऊन- बाळ गाडगीळ : ( दुर्मीळ पुस्तक , प्रकार- ललितलेखसंग्रह, लघुनिबंध, साहित्यविषयक, आठवणी, सदर लेखन )
( 'सकाळचे ऊन' मधील लेख हे म्हटले तर लघुनिबंध आहेत. म्हटले तर 'गुजगोष्टी' आहेत. शिवाय शिळोप्याच्या गप्पाही आहेत.
प्रासंगिक असे फार थोडे लेख या संग्रहात असतील. त्यामुळे त्यातला ताजेपणा आणि रसरशीतपणा वाचकांना जाणवावा. या लेखनालाही गाडगीळांच्या इतर लेखनाप्रमाणे विनोदाची झालर, किनार वगैरे नाही. झालर किंवा किनार वस्त्रात चिकटविलेली, उसनी असते. या लेखातला विनोद त्या लेखनाशी एकरूप झालेला असाच आहे. त्यामुळे त्यात कुठेही कृत्रिमपणा जाणवणार नाही. तसेच या विनोदात भडकपणाही नाही. सौम्य, सहजसुंदर विनोदाची पखरण या सकाळच्या उन्हात सापडेल. नाहीतरी सकाळचे ऊन ऊबदारच असावे, भाजणारे असू नये. मऊमऊ शालीप्रमाणे आपणाला हे ऊन आपल्याभोवती लपेटता यावे. आणि निसर्ग जसा उग्र, रौद्र, भयानक असू शकतो तसेच त्याचे एक शालीन, मार्दवयुक्त असे रूपही असू शकते हे थंडीतल्या कोवळ्या उन्हातच आपल्याला जाणवावे.
या लेखनात कुठलेच चिरकालीन सत्य वगैरे सांगितलेले नाही. कारण तसे काहीच अस्तित्वात नाही. नसते. येथे सापडेल ते माणसाच्या स्वभावातील वैचित्र्याचे आणि वैविध्याचे दर्शन आणि यातून निर्माण होणाऱ्या अनेक गमतीजमती. )
०००
८)विस्तारलेलं क्षितिज- संपा. डॉ. हे. वि. इनामदार/ डॉ. अंजली सोमण: ( दुर्मीळ पुस्तक, प्रकार- मराठी लेखिकांच्या निवडक कथा, संपादन )
दुसर्या आवृत्तीच्या निमित्ताने-
‘विस्तारलेलं क्षितिज' ची दुसरी आवृत्ती निघत आहे, हा आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा योग आहे. १९७९ साली हे पुस्तक प्रसिद्ध झाले, तेव्हा स्त्रियांच्या कथालेखनाचा स्वतंत्रपणे विचार करणारे ग्रंथ (एखादा अपवाद सोडता) मराठीत उपलब्ध नव्हते. किंबहुना असा स्वतंत्र अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही, असे प्रतिपादन करणाराही एक वर्ग होता. असे असतानाही हे पुस्तक त्या वेळी आम्ही संपादित करायचे ठरवले. याची कारणे दोन. एक तर, मराठीत स्त्री-कथाकारांनी घातलेली भर मोलाची आहे. वाङ्मयेतिहासात किंवा अन्यत्र पुरुष कथाकारांच्या गर्दीत स्त्री-कथाकारांची, त्यांच्या गुणवत्तेची योग्य ती दखल घेतली जात नाही, हे लक्षात आले होते.
दुसरे कारण सामाजिक आहे. ते असे की, भारतासारख्या स्त्री-पुरुष विषमता पिढ्यान् पिढ्या मानणाऱ्या समाजात स्त्रियांचा स्वतंत्र असा (बव्हंशी उपेक्षित राहिलेला) गट तयार होतो. प्राप्त परिस्थितीत या गटाची स्वतःची अशी मानसिकता तयार होते. ही पुरुषांच्या कथांपेक्षा स्त्रियांच्या कथांतून वेगवेगळ्या बाजूंनी आणि अधिक सूक्ष्मपणे व्यक्त होते, असे आम्हाला वाटते. या दृष्टीनेही स्त्रियांच्या कथालेखनाचा एकत्रित विचार होणे गरजेचे होते.
मात्र संग्रहासाठी कथा निवडताना केवळ स्त्रियांच्या समस्या मांडणाऱ्या कथा निवडल्या नाहीत, तर सौंदर्यपूर्ण आकृतिबंध दाखवणाऱ्या, कथेच्या विकासाच्या नव्या शक्यता सूचित करणाऱ्या कथाही आम्ही निवडल्या. जेणेकरून स्त्री-कथाकारांची वाङ्मयीन बलस्थानेही लक्षात यावीत व हा अभ्यास 'वाङ्मयीन-सामाजिक' व्हावा.
१९८० ते १९९० या दशकात मराठी कथासाहित्यात स्त्रियांनी घातलेली भरही पूर्वीच्या कालखंडाप्रमाणेच महत्त्वाची आहे. हा संग्रह परिपूर्ण व अद्ययावत् होण्याच्या दृष्टीने या दशकातील महत्त्वाच्या स्त्री-कथाकारांच्या तीन कथा आम्ही दुसऱ्या आवृत्तीसाठी निवडलेल्या आहेत. या निवडीमागे अर्थातच वर उल्लेखिलेलीच भूमिका आहे. )
९)ऑक्टोपस- लक्ष्मीकांत देशमुख: आऊट ऑफ प्रिन्ट पुस्तक, प्रकार- सामाजिक कादंबरी)
( लक्ष्मीकांत देशमुख हे नाव आता मराठी वाचकांना सुपरिचित झाले आहे. इन्किलाब विरुद्ध जिहाद, अंधेर नगरी, पाणी! पाणी!!, मराठवाडा मुक्ती संग्राम ही त्यांची गाजलेली पुस्तके उच्च सनदी अधिकारी या अनुभवातून साकारलेली 'ऑक्टोपस' ही त्यांची नवी कादंबरी.
ऑक्टोपस' हे भ्रष्टाचाराचं प्रतिक. त्याची टेंटॅकल्स जसे भक्ष्याला विळखा घालून जखडतात, तसं आज भ्रष्टाचारानं अवघं भारतीय समाजजीवन जखडून टाकलं आहे. या भ्रष्टाचाररूपी ऑक्टोपसच्या विळख्यातून कसं सुटायचं हा एक यक्ष प्रश्न आहे. असा प्रयत्न करणारा व स्वच्छ आणि निस्पृह प्रशासन करणाऱ्या मुठभरांना ही भ्रष्टाचाराची व्यवस्था एवढी जेरीस आणते की, एकतर ते वैफल्यग्रस्त होत बाजूस होतात किंवा निरुपायानं त्या यंत्रणेशी मिळवून घेत त्याचा भाग बनतात आणि भ्रष्टाचाराचं वर्तुळ पुन्हा पूर्ण होत जातं. ऑक्टोपसचा विळखा अधिक करकचून आवळला जातो. महसूल यंत्रणेत काम करणारे व नीतिमूल्य मानणारे दोन अधिकारी एक अधिकारसंपन्न कलेक्टर व एक केवळ काम करणे आणि वरिष्ठांचे व भ्रष्ट समाजाचे राग, लोभ झेलण्याचा व थपडाच खाण्याचा अधिकार असलेला तलाठी यांच्या जगण्याची, मोह व संघर्षाची आणि भ्रष्टाचाराशी लढा देताना अंतिमतः पराभूत होण्याची ही कादंबरी म्हणजे 'ऑक्टोपस'. ती वेगवान घटना, वास्तववादी पात्रे व मूलगामी समाजचिंतनानं रंजक, वाचनीय व त्याचबरोबर उद्बोधक झाली आहे. मराठी साहित्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील शासकीय यंत्रणेचा भ्रष्टाचार व त्यात अडकलेली माणसे यांचं एवढं थेट, धीट व भेदक चित्रण प्रथमच या कादंबरीद्वारे आविष्कृत होत आहे. जगण्यात नैतिकता पाळणाऱ्या प्रत्येक सुजाण व्यक्तीनं ही कादंबरी वाचलीच पाहिजे, एवढं त्याचं प्रासंगिक व चिरंतन मूल्य आहे.)
०००
१०)मुरलीधर गंधे: एक अनिकेत- संपा. वा. रा. सोनार: (दुर्मीळ पुस्तक, प्रकार- व्यक्तिदर्शन, गौरवग्रंथ, वाचन, ग्रंथालय चळवळीचाइतिहास, मराठी साहित्याचा इतिहास)
( श्री. मुरलीधर गंधे हे खानदेशातील एक समाजवादी - शीलाचे व्यक्तिमत्व. आचरणाने संपूर्णपणे गांधीवादी वृत्तीचे अनासक्त, अपरिग्रहाचा आजच्या काळातील दुर्लभ वारसा जतन करून असलेले काका गंधे यांचे तसे लौकिक एकाकी जीवन संपूर्ण सार्वजनिक कार्यात व्यतीत झालेले.
गेली काही तपे त्यांनी स्वतःस ग्रंथालयीन चळवळीस वाहून घेतले आहे. एकनिष्ठेने एकादेच कार्य करीत राहाणे हे आजच्या काळात दिसणारे दुर्मिळ चित्र. तथापि श्री. काका गंधेंनी अंगिकृत कार्यांत आयुष्याचा होम करून झोकून दिले आहे. तशा या चळवळीचा लोक-जीवनावर ठसा उमटणेही अशक्म प्रसिद्धीच्या झोतात एकवेळ माणसे काही काळ तरी कामात रंगून जातात. त्याचीही इथे शक्यता नाही.
ग्रंथालय चळवळ तशी उपेक्षित सुसंस्कृततेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातही या चळवळीचे स्वरूप असावे तितके सुदृढ नाही. अशा स्थितीत श्री. काका गंधेसारखी माणसे एकाकीपणे जी धडपड करीत आहेत, त्यास तोड नाही
या ' प्रणामा 'त व्यक्तीवर फारशी चर्चा होऊ नये अशी काकांची मनापासून इच्छा. आणि या त्यांच्या आर्त इच्छेच्या आड येण्याचे आम्हासही कारण नाही. म्हणूनच या ग्रंथाचे स्वरूप दुहेरी ठेवण्याचा प्रयत्न होता. अर्थात् याच्या स्वरूपसिद्धीसाठी त्या त्या व्यक्तींचे, संस्थांचे सहकार्य आवश्यक होते.
ग्रंथालय चळवळीशी, ग्रंथ-व्यवहाराशी हा ग्रंथ, संदर्भ-ग्रंथ ठरावा अशी काकांचीही इच्छा. त्यानुसारच या ग्रंथाचे स्वरूप निश्चित करून आम्ही संकल्प सोडला. मित्रांना निमंत्रणे दिली, आर्जवे केली आणि श्री. गंधे काकांच्या आयुष्याची ओळख असलेल्या सर्व स्नेहयांनी अत्यंत उत्कटपणे सहकार्य दिले त्यामुळेच हा ग्रंथ एकाचवेळी ग्रंथ-व्यवहाराविषयी अनेक विषयांवर चर्चा करणार संदर्भ - ग्रंथ होऊ शकला. त्याचवेळी 'श्री. मुरलीधर गंधे या व्यक्तीविषयीही अधिक प्रांजळ भावना व्यक्त करणाराही ठरला आहे.)
०००
११)सहवासातील साहित्यिक- प्रा. रमेश तेंडुलकर:
(प्रथम आवृत्ती २०००, प्रभात प्रकाशन, प्रकार- व्यक्तिचित्रे, व्यक्तिदर्शन, आठवणी, किस्से, साहित्यविषयक, साहित्यिक, कलाकार, खेळाडू )
( प्रा. अनंत काणेकर, अत्रे, वा. ल. यांच्यापासून अमिताभ, सचिनसह नितीन तेंडुलकरपर्यंत प्रा. तेंडुलकरांनी अनेकांच्या आठवणी आत्मीयतेने व जिव्हाळ्याने लिहिल्या आहेत. या व्यक्तींमध्ये काही व्यक्ती का आल्या नाहीत? उदा. वसंत सावंत, केशव मेश्राम, चंद्रकांत बांदिवडेकर, कृ. रा. सावंत, वि. शं. चौगुले, गंगाधर पाटील, विजया राजाध्यक्ष, वसंत बापट, विश्वास पाटील, एकनाथ साखळकर इत्यादी. शांताबाईंवर तर त्यांना दीर्घलेखन करायचं होतं आणि त्याबद्दल ते बोललेही होते. पण हे त्यांच्याकडून राहून गेलं. या व्यक्तींबद्दल त्यांना आस्था होती, ओढ होती, आपुलकी होती. त्यांची जवळीकही होती. पण ठरवून लेखन करणं हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. या पुस्तकातील लेख निमित्ताने लिहिले गेलेत, असं सरळ दिसून येतं. रा. भि. जोशी निवृत्त झाले म्हणून, काणेकर, अत्रे, पुंडलिक गेले म्हणून, तर विंदा, पाडगावकरांनी साठीत प्रवेश केला म्हणून, अशी काही ना काही कारणं त्या लेखांच्या मुळाशी आहेत. जे काही लेख आहेत, त्यातही एका संवेदनशील कविमनाचं मनोज्ञ दर्शन घडतं.
कुसुमाग्रजांना भेटल्यानंतर तेंडुलकर त्यांना वाकून नमस्कार करतात, तेव्हा ते आपल्या आदरणीय माणसाबद्दलची ओतप्रोत भरून राहिलेली भावनाच उभी करतात. "पुंडलिकांच्या अनेक कथांमध्ये लहान मुलं येतात. त्यांच्या दिवंगत मुलाची - आशूची - आठवण चाळवली. जाणार नाही अशा बेताने, अशा खुबीने त्यांच्या या कथांची चर्चा आपण करायची,” असं मनात तेंडुलकर ठरवतात, तेव्हा एका वडिलांच्या दुखऱ्या मनाला जपणारा मित्र केवळ तिथे तेंडुलकरांमध्ये उरत नाही, तर मनाने नाजूक झालेल्या आणि उभारी घेऊ न शकणाऱ्या विकलांग माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करून सांभाळू पाहणाऱ्या मोठ्या मनाच्या समजूतदार माणसाचं दर्शन आपल्याला होतं. अत्र्यांनी पत्नीच्या निधनानंतर तेंडुलकरांचं तीन महिन्यांनी सांत्वन केल्यावर ‘भडभडून’ येणारे तेंडुलकर आणि अत्र्यांनी ती घटना लक्षात ठेवली होती या जाणिवेनेही 'मन गलबलून’ जाणारे तेंडुलकर किती 'तुटलेपण' भोगत होते हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. १३ जूनला अत्रे गेले. १३ मेला तेंडुलकरांची आजी गेली. “माझ्या वैयक्तिक जीवनात ती घटना मला एका युगान्तासारखी वाटली. कुठेतरी माझ्या मनाची क्षितिजं संकोचली जात आहेत असं वाटलं,” असं एकाकी दुःख सोसणारे तेंडुलकर आपल्याला भेटतात. 'भो पंचम जॉर्ज’ पाठ्यपुस्तक मालश्यांच्या घरी कितीतरी वेळ मनोमन कुरवाळणारे तेंडुलकर पुस्तकाबरोबरच्या शालेय आठवणींनी हळुवार होतात. मुलांच्या भविष्याच्या काळजीने गंभीर, बेचैन होणारे वडील तेंडुलकर कोणत्याही मुलाला हेवा वाटावा असेच लख्ख प्रकट होतात. अमिताभ मृत्यूच्या छायेत ब्रीच कँडीला तळमळत असताना अस्वस्थ होणारे तेंडुलकर आणि देशपांडे नावाचा बालमित्र आता कुठे असेल या विचाराने तळमळणारे तेंडुलकर नातेसंबंधाची एक वेगळीच मर्मबंधातली ठेव समोर उघडी करतात. हे सारेच प्रसंग मोठे मनोज्ञ आहेत.
तेंडुलकरांनी लिहिलेल्या या व्यक्तिचित्रांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तल्लख स्मरणशक्ती.
०००
📨पोस्टेज वेगळे.
📞संपर्क क्रमांक :-
Book Roof Online Book Store:-
+91 87998 21809, पुणे .
⚠️महत्वाची सूचना :-
(हा बुक रूफ चा एकमेव व्हॉट्स ॲप आणि संपर्क नंबर आहे. पुस्तके हवी असल्यास तसेच अधिक माहितीसाठी यावर मेसेज किंवा थेट संपर्क करावा. कमेंट मध्ये कोणीही मोबाईल नंबर देऊ नयेत, कृपया सर्वांनी ही काळजी घ्यावी ही विनंती. धन्यवाद)