27/08/2024
Times have changed (a bit too much)!
पुरषा फुकट रे तू फुकट, अरे Times have changed.
आमच्या संकुलात दहीहंडी जोरदार सुरू होती. पथकं येऊन सलामी देऊन जात होती. डीजे दणाणत होता. सगळं अगदी साग्रसंगीत सुरू होतं. पण इराला त्याचं सोयर-सुतक नव्हतं. बरं बघ्यांमध्ये कुणीतरी फिरंगी होती, ती मोबाइलमधून व्हिडियो काढत होती. पण साधारण पहिली ते चौथी या वयात जी मुलांना उत्सुकता असते, ती अजिबात नव्हती. कदाचित यापेक्षा जास्त थ्रिल त्यांना मोबाइलवर दिसत असावं.
मला मात्र कॉलनीतले दिवस आठवले. आमच्या चौकात बहुधा चार कोपऱ्यात चार छोट्या हंड्या आणि मध्यभागी तुलनेने मोठी हंडी. ब २४२, २४३ आणि २५३, अशी तीन बिल्डिंगमध्ये आम्ही वर्गणी काढायचो. म्हणजे एकूण २४ घरं. त्यातलं कुणी थोडे जास्त द्यायचे, कुणी कमी, वरून घरून थोडं थोडं कॉन्ट्रि असायचंच. दहीहंडी म्हणजे केवळ दहीहंडी फोडणं नव्हे तर मडकं, दोर, दही, दूध, साखर आणणं. बाजूला लावायला थोडीफार फळं, नारळ वगैरे आणला जायचा. मग मडक्यासाठी शिंकाळं तयार करायचो. तेव्हा आमच्यासाठी ती खास टेक्निक होती. पुढे हंडी बांधल्यावर जाड दोरखंडाला एक पातळ सुतळ बांधून ती समोरच्या सोनमोहराच्या झाडावर लावायची आणि बहुधा आमच्या घरी एक टोक. कारण घर पहिल्या मजल्यावर होतं आणि आमचं मनुष्यबळही दोन-तीन थरांच्या हंडीचंच होतं. आमच्या टीमचं सरासरी वय १०-११ असावं. पण हे सगळं सगळे मिळून करायचो. तुम्हाल जमेल का, असा प्रश्न तेव्हा कुणीही विचारला नाही. असो, तर वर कोण चढणार याची चढाओढ असायची. पण बहुधा उंच मुलं खाली आणि कमी उंचीच्या मुलाला हंडी फोडायचा मान मिळायचा. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती दोन थरांची हंडी फोडली की, समोरच्या कोपऱ्यात जायचो. तिथे आम्ही हात द्यायला. मला अजूनही आठवतंय, एकाने उत्साहात नारळाऐवजी स्वतःचं कपाळ हंडीवर आपटलं होतं. हंडी फुटली नाही, पण त्याच्या कपाळावर मात्र जखम झाली. मग लगेच हळद चेपून लावली आणि पुढच्या चढाईला तयार.
तोपर्यंत दुपारी १२-१ च्या सुमारास मधली मोठी हंडी फोडायची वेळ होई. माझ्या आठवणीत दहीहंडीच्या दिवशी क्वचितच पाऊस आलेला आहे. आज होता, तसा तर अजिबात नाही. खरं तर खांद्यावर पाय ठेवून खांदे सोलवटलेले असायचे. घाम टोचून शरीराला पाणी हवं असायचं पण पाऊस पडेल तर शपथ. तेव्हा तर गोविंदांच्या पाठीवर फुगे वगैरेही मारले जायचे.
यावर उतारा म्हणून गोविंदा रे गोपाळा… यांच्या घरात नाही पाणी घागर… म्हणत आमच्या कोपऱ्याखाली फेर धरायचो. आधी गार पाण्याच्या बादल्या ओतल्या जायच्या. त्यावेळी घरच्या माळ्यावर टाक्या वगैरे बसायची पद्धत नव्हती. तरी सगळे भिजतील एवढं पाणी पडायचं. त्यानंतर अचानक कुणाच्या तरी बादलीतून चक्क गरम पाणी यायचं. त्या स्पर्शाचे तर क्या कहने!
मग आमच्या हंडीला लावलेल्या फळांचा, नारळाचा प्रसाद तयार करायचो आणि इमाने-इतबारे सगळ्या घरांमध्ये वाटायचो. उरलेला आम्ही गट्टम करायचो. त्यापैकी केळ्यांची हालत जरा जास्त बुळबुळीत असायची. ओलं खोबरं, पेर, केळं, त्यावर थोडी साखर पेरलेली असा तो प्रसाद जबरदस्तच लागायचा. घरी हमखास दही पोहे असायचे. हे सगळं खाऊन पोटोबा तृप्त झाला की, बांद्र्यातल्या इतर थोड्या फार हंड्या पाहायला जायचो. पण आकर्षण असायचं ते गिरगावातल्या हंड्यांचं आणि दादरच्या आयडिअलच्या हंडीचं. पण त्याचं समालोजन टीव्हीवर असायचं.
पण गेल्या काही वर्षांत माझाही उत्साह फारच कमी झाला आहे. सणाला राजकीय स्वरुप आणि शक्तिप्रदर्शन होऊ लागल्यानंतर बक्षीसाच्या रकमेचंही वाटेनासं झालंय आणि थरांच्या संख्येचंही. त्यातच पत्रकारितेत असताना दहीहंडीच्या दिवशी साधारण चार-पाचच्या सुमारास सायन हॉस्पिटलमध्ये चक्कर ठरलेली आणि रात्रीही विविध सरकारी हॉस्पिटलना फोन करून जखमींची संख्या जाणून घ्यायची, हा दरवर्षीचा नित्यक्रम ठरलेला असायचा.
अजूनही कदाचित गावांमध्ये छान हंडी असावी. कारण तिथं घराघरात हंडी असते. काला जमा केला जातो आणि मग तो सगळे मिळून खातात. ही आठवणही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. राजकीय लोण तिथेही पोहोचलं असेल तर कठीण आहे.
पण चितळे मास्तर म्हणतात तसं, Times have changed!